करोना विषाणू संसर्गाविषयी एक नम्र विनंती

जगामध्ये चाललेल्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे गाव, तालुका, जिल्हा आणि शहरी भागात बऱ्याच सोसायटीमधील राहणाऱ्या माणसा माणसात असा प्रकार चालत आहे कि, करोना झालेल्या रुग्णाकडे व त्याच्या परिवारांकडे तिरस्कारांने पाहिले जाते, साधी त्याची व त्याच्या परिवाराची विचारपूस सुद्धा करत नाहीत, किंवा त्यांच्याशी बोलत सुद्धा नाहीत.

पण आता सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे कि, येणाऱ्या काळात करोनाची लागण जवळपास ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अश्या बऱ्याच जणांना होणार आहे, त्यामुळे जी वेळ आज एका कुटुंबावर आहे ती वेळ उद्या आपल्यावर पण येऊ शकते, याचे सर्वांनी भान ठेवणे आवश्यक आहे.

आज आपल्या आजूबाजूला दिवसभरात कितीतरी करोना रुग्ण आपल्या संपर्कात येत असतील ज्यात आपण घेत असलेले भाजीवाले, दुकानदार, दूधवाला आणि असे कितीतरी जण ज्यानी covid ची टेस्ट केली नसल्यामुळे आपल्याला ते सामान्य वाटतात. त्यामुळे करोना रुग्ण भेटला की, त्याच्यापासून व त्याच्या परिवाराबरोबर माणुसकी सोडून लांब पळणे हे खूप चुकीचे आहे.

तरी कृपया आपल्या सर्वाना विनंती आहे की, आपल्या परिचयाचे किंवा मित्र परिवार पैकी कोणाला करोनाची लागण झाल्यास आपण नक्की योग्य ते अंतर पाळून, आपल्या जीवाची काळजी घेऊन सदर व्यक्तीस व त्यांच्या कुटुंबासाठी योग्य जमेल ती मदत करावी त्याचाबरोबर त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करावे, ही सामाजिक विनंती आहे. त्या व्यक्तीला व कुटुंबाला शब्दाचा आधार देणे हि खूप मोठी गोष्ट आहे.

त्यासाठी आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही.

आपला मित्र
विवेक पाटकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.