धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू – हरि नरके

” यशवंतराव होळकर हे कधीही पराभूत न झालेले ( पराभव न स्विकारलेले – लेखक सोनवणी यांचे भाषेत ) योद्धे होते. त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकामुळे धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू झाले आहे,” असे मत ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके यांनी व्यक्त केले. नरके पुढे म्हणाले, इतिहास घडविण्यासाठी तो माहीत असायला हवा. कोणत्याही लेखकाचे पुस्तक वाचताना वाचक खडबडून जागा व्हायला हवा. सोनवणी यांनी या पुस्तकाच्या रूपाने धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू केले. कधीही पराभूत न झालेला योद्धा म्हणजे यशवंतराव होळकर होय.
परंतु, त्यांच्या इतिहासाचे लेखन न झाल्याने ते सर्वांना अपरिचित राहिले. या पुस्तकामध्ये सोनवणी यांनी अभ्यासपूर्ण व सोप्या पद्धतीने होळकरांचे चरित्र मांडले आहे.” आपल्या अध्यक्षीय भाषण करताना मा. नरके यांनी भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर या संजय सोनवणी लिखित चरित्रग्रंथाचे विश्लेषन आणि मुल्यमापन नि:पक्षपातीपणे केले. महात्मा फुले यांनी शिवरायांचा इतिहास पुनर्जिवित केला. शिवरायांनंतर ज्या माणसाने इंग्रजा सारख्या जगावर राज्य करणार्या बलाढ्य शत्रु विरुद्द टक्कर घेतली, त्यांचा अनेक वेळा (18 वेळा) पराभव केला, अशा महाराजा यशवंतराव होळकर यांचे चरित्र लिहुन संजय सोनवणी यांनी इतिहास पुनर्जिवित केला असल्याचे सांगीतले. सामाजिक असमतोलतेचा तिटकारा बाळगणारे मा.नरकें यांनी नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणाले , केवळ ब्राह्मणांना शिव्या घालणे, ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे, ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोक समतेच्या चळवळीत नवीन विष-मत तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद, मुद्दे खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसे गुद्दयाची बात करतात. या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही. मा. जानकर यांची साथ मिळाल्याने आम्हाला बळ मिळाले आहे. आज काल इतिहास संशोधकांचे पीक आले आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. हे लबाड लोक विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचे चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार आहेत. ते पुढे म्हणतात, इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहोत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य सोनवणी सारखा गुणसंपन्न माणूसच करू शकतो.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.