मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला मोठा बदल!

मुंबई, दि. १८ जुलै, २०२०: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या रुग्ण संख्येने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असतानाही राजकीय वातावरण देखील गरम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मोठा बदल केला आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात अचानक केलेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रिन्सीपल सेक्रटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारी पदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सीपल सेक्रेटरी पदावर बदली केली आहे. तर पर्यटन मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची बदली केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी अचानक केलेल्या महत्त्वाच्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली होती. आठवड्याभरात या दोन नेत्यांची ही चौथी बैठक होती. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवारांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती.

त्यामुळे आघाडीत नेमकं काय चाललं याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. तर मी नियमित मुख्यमंत्र्यांची भेट घेतो त्यामध्ये फारसं काहीही असं नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं. राजस्थानमधील घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध झाले असून नाराज काँग्रेससोबत संवाद वाढवण्याचे संकेत त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.