८५ वर्षांच्या साधा मेंढपाळाने, स्वतः एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले...

बकऱ्यांना चारता चारता खोदले १४ तलाव, ४० वर्षांपूर्वी केली सुरूवात

जून २०२० महिन्यात नुकत्याच झालेल्या मन की बातमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी केरे  कामेगौडा या व्यक्तीचा उल्लेख केला... कामेगौडा कोण? थोडी उत्सुकता जागी झाली आणि म्हटलं जाणून घ्यावं नक्की कोण आहे हा अवलिया??

जगात काही घडू शकत. असं आपण बरेच वेळा म्हणतो आणि त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बिहारच्या दशरथ मांझीने पहाड खोदून मार्ग तयार केला होता, अगदी त्याच्यावर एक हिंदी चित्रपट ही येऊन गेला. अशाच एखाद्या चित्रपटाला साजेशी कामगिरी कामेगौडा यांची आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले या ८५ वर्षांच्या अवलियाने... कामेगौडा यांचं घर कर्नाटक येथील मांड्या गावातील डासनाडोड्डीमध्ये आहे. ते मेंढपाळ असून कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढी चरवतात.

४० वर्षांपूर्वी ते जेव्हा मेंढ्या डोंगरावर चरायला जात, तेव्हा तेथे जनावरांना प्यायला पाणी नसल्याचं त्यांना लक्षात आलं. पहाडी जागा असल्याने तेथे पावसाचं पाणी जमा होत नसे. तेव्हा त्यांच्या डोक्यात तलाव बनवण्याची कल्पना आली. सुरवातीला ते काठीने खड्डा खोदत. मात्र ते त्यांना कठीण जाऊ लागलं म्हणून त्यांनी काही अवजार विकत घेण्याचं ठरवलं.

आता मेंढपाळाकडे कुठले आले इतके पैसे? मग त्यांनी काही मेंढ्या विकून अवजार विकत घेतले व खड्डे तयार करण्याचं काम सुरु ठेवलं. पावसाळा आला, खड्ड्यांचं रूपांतर तलावात झालं. जनावरांना पाणी मिळू लागलं तसा कामेगौडा यांचा उत्साह वाढू लागला. लोकांच्या टिंगल टवाळीकडे लक्ष न देता त्यांनी नव्या जोमाने त्यांनी अजून काही तलाव खोदले. त्यांनी २०१७ पर्यंत केवळ सहा तलाव बनवले होते मात्र गेल्या एक-दीड वर्षात लोकसहभागामुळे ही संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली. त्यांनी बनवलेले १४ तलाव हे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे विशेष..!!
तसेच त्यांनी डोंगरावर जवळपास २००० वडाची झाडं देखील लावली आहेत. त्यांना या कार्यासाठी अनेक बक्षिसे मिळाली आणि जे पैसे मिळाले ते त्यांनी पुन्हा तलावांच्या निर्मितीसाठी वापरले...

कामेगौडा आज ही त्यांचं काम करत आहेत. त्यांचं घर डासनाडोड्डीमध्ये असून त्यांचा परिवार झोपडीत राहतो. कामेगौडा हे कुंदिनीबेट्टा गावाजवळ बकऱ्या चारतात. केरे सांगतात, मी सुरवातीला काठीने खड्डा खोदायचो हे खूप कठीण काम होत. त्यानंतर मी माझ्याजवळील काही मेंढ्या विकून खड्डे खोदण्यासाठी अवजारे विकत घेतली आणि काम सुरु केले. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळतयं हे माझ्या लक्षात आले. हे पाहून मी माझ काम सुरू ठेवले.

कामेगौडा यांचा मुलगा म्हणतो- कुठलेही शिक्षण न झालेल्या माझ्या वडिलांनी पाण्याचा प्रवाह आणि इतर टेक्निक विकसित करून घेतल्या. माझे वडिल फक्त रात्री घरी येतात, दिवसभर ते डोंगरावरील आपली झाडे आणि तलावांची काळजी घेत असतात. त्यांनी स्वतःला या कामात एवढे झोकून दिले आहे की, ते ८५ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असे न थकता काम करत आहेत.
देशाचे मा. पंतप्रधानांकडून अशा योग्य समाजरत्नांचा उल्लेख होतोय आणि त्यांचा यथोचित गौरव होत आहे, हे पाहून मनाला समाधान वाटत आहे. आपल्या ही आजूबाजूला असे अनेक दुर्लक्षित मांझी, कामेगौडा काम करत असतात, त्या सर्वांच्या कार्यास मनापासून सलाम...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.