पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले: अनिल गोटे यांचा आरोप

धुळे, दि. २८ जून, २०२०: भाजपने गोपीचंद पडळकर यांना हाताशी धरून शरद पवारांवर हीन पातळीवरील आरोप करायला लावले आहेत. यामागे धनगर व मराठा या दोन्ही समाजांमध्ये कलह निर्माण व्हावा हा भाजपचा छुपा अजेंडा आहे, असा आरोप माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचे चंपा हे नाव गिरीष महाजन यांनीच ठेवले असल्याचेही गोटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गोटे म्हणतात की, गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना अवमानास्पद व हीन दर्जाची उपमा दिली. यातून भाजपच्या नेत्यांची राजकारणातील पातळी लक्षात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना मी ‘महारोग’ असे म्हणालो आहे, ‘महारोगी’नव्हे

आमदार राम कदम यांनी राहूल महाजन यांच्यासह एका महिलेसोबत फोटोसेशन केले होते.

देवेंद्र फडणवीसांचे ‘टरबूज्या’ हे नाव भाजप नेत्यांनीच ठेवले आहे.
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी तातडीने खुलासा करणे आवश्यक होते. प्रारंभीचे २४ तास भाजपच्या एकाही नेत्यांने कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. राज्यात नेमकी काय प्रतिक्रीया उमटते याची वाट पाहत बसले. विधान परिषदेचे‍ विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे स्वत: पडळकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरू पाहत होते.

जनमाणसांमधील तीव्र संतापाच्या झळा भाजप नेत्यांपर्यंत पोहचू लागताच भाजपने सारवा सारव सुरु केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांना ‘चंपा’  म्हणतात. याचे त्यांना तीव्र दु:ख होत आहे. त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणे मांडले. चंद्रकांतदादांना हे माहित नसावे की, त्यांचे  ‘चंपा’ नावाचे बारसे स्वत: गिरीष महाजनांनी घातले आहे.

महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना अरे त्या ‘चंपा’ला फोन लाव असे ते म्हणाले होते. भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच दिली नाही. आपांपसातील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले.

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी गटात असलेले अनेके नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे. आता तर, हेच नाव श्रर्वश्रृत झाले. त्याला विरोधी पक्ष करणार तरी काय करणार? तसेही भाजपमध्ये स्वत:चे नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पद्धत आहेच.

नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात. अमित शहांना ‘मोटाभाई’ म्हणतात. तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत. हे माझे भोळे-भाबडे विचार आहेत.

आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘पडळकर हे स्वत: स्पष्टीकरण देतील’ असे म्हटले होते. पण गेल्या चार दिवसांत तरी अजून पडळकरांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. उलट पडकळरांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. फटाक्यांच्या माळा लावून त्यांचे स्वागत करीत आहेत. आरत्या ओवाळल्या जात आहेत.
'कोरोना’मुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला आहे. दुधाचे भाव पडले. दुध स्वस्त झाले. दुधाच्या पडलेल्या भावाचा गैरफायदा घेऊन भाजपाचे कार्यकर्ते पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक करीत आहेत.

आमच्या धनगर समाजातील काही तरूणांना हाताशी धरुन शरद पवारांच्या जातीचा उल्लेख केला जात आहे. यातून धनगर समाजाला समस्त मराठा समाजाविरूद्ध भडकविण्याचे उद्योग बेमालुमपणे सुरु आहेत.

भाजपाचा महाराष्ट्रातील छुपा अजेंडा राबविण्याचे काम शाखाशाखांमधून कुजबूज आंदोलनाद्वारे सुरू आहे.

नरेंद्र मोदी व अमित शाह जोडीने ‘कोरोना’चा आधार घेऊन हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतून मराठा समाजावर तीर मारुन धनगरांना उचकवित आहेत. अर्थात पडळकरांनी आपल्या वक्तव्याच स्पष्टीकरण देतांना ‘भावनेच्या भरात मी बोलून गेलो’ असे म्हटले. भावनेच्या भरात बोलले असे खरे मानले तरी सुध्दा ‘पोटात होते तेच ओठात आले’ असा अर्थ होतो.

भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम प्रसार माध्यमांसमोर बोलतांना ‘अनिल गोटे यांचे वय झाले’ असे म्हणाले. माझ्या वयाची त्यांना नेमकी काय अडचण निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? नाथाभाऊंच्या प्रकृतीबद्दल पक्षातील विरोधकांकडून अशीच वक्तव्ये केली जात होती. संतापून भाऊंनी उत्तर दिले होते, ज्यांना करायची असेल माझ्या प्रकृतीची खात्री, त्यांनी घरी बोलवावे मला मध्यरात्री !

प्रवक्ते राम कदमांना एवढेच सांगतो की, समुद्र किनारी जावून तोकड्या चड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का ? माझ्या बद्दल जेवढे वैयक्तीक बोलाल तेवढेच मी तुम्हाला समजणाऱ्या भाषेत उत्तर देईन. माझ्या नादी लागू नका.

देवेंद्र फडणवीसांना मी ‘महारोग’ म्हणालो. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. प्रसिद्धी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहीले आहे.

फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. ‘महारोगी’ असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे, असे गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

1 टिप्पणी:

  1. एकदम खरे बोलले आहेत,आनिलआन्ना गोटे साहेब यात काहिही चुकिचे नाही भाजपा मधील सर्व लोक खोटारडे आहेत टरबुज्या,चंपा.सर्व समाजात भांडने लावुन तमाशा पाहतायत.लाजा वाटत नाही त्यांना ऐव्हढे भाजपा मधले लोक बिनलाजे आहेत.

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.