धनगर आरक्षण : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

लोकसत्ता, २२, फेब्रुवारी २०१९, मुंबई - धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. यावेळी बैठकीला सुभाष देसाई यांचीही उपस्थितीती होती. मराठा समाजाला शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळाले असतानाच आता राज्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.


धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टीस) अहवाल राज्य सरकारला मिळाला असून त्याची छाननी सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर आरक्षणाबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. धनगर आरक्षणाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी रात्री वर्षां निवासस्थानी भेट घेतली. या विषयावर राज्य सरकार काय करणार आहे? अशी विचारणा ठाकरे यांनी केली. त्यावर ‘टीस’चा अहवाल महाधिवक्ता यांच्याकडे दिला आहे. ते कार्यवाही करीत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धनगर समाजास आरक्षण देण्याची घोषणा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात अनेक भागात धनगर समाजाने आंदोलन देखील केले होते.
धनगर आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल प्राप्त होताच, केंद्राकडे तशी शिफारस केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात दिले होते. दुसरीकडे शिवसेनाही धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आग्रही आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.