…आणि पानिपत

पानिपत ही मराठ्यांची एक घोर शोकांतिका मानली जाते. पानिपत युद्धात महाराष्ट्रात घरटी बांगडी फुटली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ह्या शोकांतिकेकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहण्याचे साहस आपल्याकडे साहित्य वा संशोधनातुन झालेले नाही हे एक दुर्दैव आहे. पानिपतसारख्या शोकांतिका एकाएकी घडत नसतात. त्यामागे विशिश्ट प्रकारची प्रदीर्घ कारणपरंपरा असते. तत्कालीन समाजाचे, राजकारणाचे आणि जोपासण्यात आलेल्या एकुणातीलच संस्क्रुतीचे ते एक अटळ रुप असते.
त्यामुळे पानिपतसारख्या युद्धाकडे वा त्या काळातील नेत्यांकडे आज केवळ उदात्तीकरणाच्या भुमिकेतुन पाहुन चालणार नाही तर ज्या सामाजिक/राजकिय कारणपरंपरेमुळे अशा शोकांतिका घडतात त्याची समाजशास्त्रीय विष्लेषना व्हायला हवी असे मला वाटते आणि त्यातुनच “…आणि पानिपत” या कादंबरीचा जन्म झाला आहे.
आपल्याकडील ऐतिहासिक कादंबरी अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्या-त्या इतिहासातील मोठ्या व्यक्तींना नायक वा खलनायक ठरवण्यासाठी, त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी विशिश्ट जातीय चष्म्यातुन या कादंबर्या लिहिल्या गेल्या आहेत असे आपल्या लक्षात येइल. त्यामुळे या कादंबर्या वा नाटके “पोशाखी” स्वरुप धारण करतात. नव्या बखरी बनतात. त्यातुन वाचकाला प्रगल्भ करण्याचे कार्य घडत नाही. होते ते फक्त उदात्तीकरण! आणि ते मला या कादंबरीत अनुस्युत नाही. ही कादंबरी एका अर्थाने जनसामांन्यांचा इतिहास आहे. त्यांच्या आशा-आकांक्षा आणि पडझडीचा इतिहास आहे. शिवरायांचे जनसामान्यांचे नेत्रुत्व काळाच्या पडद्याआड घालवण्यात आल्यानंतर (?) काही काळातच महाराष्ट्रात जी नवी, उच्चवर्णीयांनी आपल्या हितसंबंधांसाठी, समिकरणे उदयाला आणली, क्रम:श जनतेवर लादली त्यातुन प्रजा आणि शासक यात दुरावा निर्माण होत गेला. “रयतेचा राजा” ही संकल्पना बाद ठरली. प्रजा फक्त लुटुन घेण्यापुरती उरली. फायदे झाले फक्त शासकांच्या समजातीय मंडळींचे….ब्राह्मण वर्गाचे. सरदार-दरकदार वर्गाचे. या दोन्ही शासक वर्गातही जातीय तीढा होताच हे आपण “…नजीबाचे पारिपत्य केल्यास ब्राह्मण आपल्याला धोतरे बडवायला ठेवतील…” या होळ्करांच्या प्रसिद्ध उक्तिवरुन पाहु शकतो.
औरंग्जेबाच्या म्रुत्युनंतर उत्तरेतही वेगळी अवस्था राहिली नाही. इकडे च्छ्त्रपती नामधारी बनले आणि पेशवे सर्वोपरी बनले, तसेच तिकडे पातशहा जवळ्पास नामधारी बनले तर वजीर खरे सत्ताधारी बनले. नादिरशहाचे मोगलांचा खरा-खुरा कणा मोडणारे अति-हिंसक आक्रमण ही मोगलांनीच निर्माण केलेली अवस्था होती. त्यामुळे मोगल विकलांग झाले. नादिरशहा परत गेल्यानंतर मराठे आपला पराक्रम दाखवायला उत्तरेत पुन्हा घुसु लागले आणि आधीच नागवल्या गेलेल्या रयतेवर/मोगल सरदारांवर/पातशाहाच्या उरावर बसु लागले. शाह वलिउल्लाह या हाजीच्या राष्ट्रद्रोही कारवायांकडे कोणीही लक्ष पुरवले नाही आणि याचाच परिपाक म्हणजे अब्दालीची सलग झालेली चार आक्रमणे. पातशाहीच्या रक्षणाची हमी घेतलेले मराठे एकाही आक्रमणाचा प्रतिकार करायला आले नाही. उलट अब्दाली उरली-सुरली दौलत लुटुन, हिंदुच्या मथुरेतील मंदिरांची वाट लावुन निघुन गेल्यानंतर राघोबादादाने अटकेपार धाव घेतली. ज्या या “पराक्रमाच्या” गौरवगाथा आज सांगितल्या जातात त्या केवळ खोट्या उदात्तीकरणाचे परिपाक आहेत.
दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर अपघाती म्रुत्यु पावला. जर शिंदे या स्थळी मारले गेले नसते तर पेशव्यांनी याही वेळेस अब्दालीच्या समाचारासाठी तत्पर झाले असते काय हा एक महत्वाचा प्रष्न आहे. बरे, या स्वारीवर कोणाला पाठवावे, तर सदाशिवराव भाउ या युद्धात कुचकामी असणार्याला. भाउलाही अब्दालीला भिडायची घाइ नव्हती म्हणुन त्याने जाणीवपुर्वक कुच धीमी ठेवली, तिर्थयात्रांना अधिक महत्व दिले. शेवटी अब्दालीला सरळ न भिडताच १४ जानेवारी १७६१ रोजी पाश्चिमात्य पद्धतीचा, सुरक्षित पलायनासाठीचा गोल बांधुन पलायन करण्याचा असफल प्रयत्न केला. बहुदा होळ्करांनीच या पलायनाची खबर नजिबाकडे आधीच पोच्ल्याने युद्ध अटळ झाले. जनकोजी वगळला तर बाकी शिंदे आणि होळ्कर आधीच पळुन गेले.
या युद्धात भाउ मारला गेला काय? खरे तर त्याचा एकही विश्वसनीय पुरावा नाही. काशिराजाची बखर जी हकीगत सांगते त्याची पद्धतच मुळात अविश्वसनीय आहे. भारताचार्य चिं. वि. वैद्य यांचाही या बाबतीत संशय आहे आणि तो हा कि “भाउ भगा…” वा “गैब झाला.” हेच बहुदा खरे असावे. असो, ही झाली या कादंबरीची थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभुमी.
या कादंबरीचे नायक आहेत तळा-गाळात पिचल्या गेलेल्या महार एका कुटुंबाचे चार पिढ्यातील पुरुष. एक वरुडे नावाचे गाव. शिवकाळातील काही प्रमाणातील का असेना, पण भोगलेले स्वातंत्र्य. अभिमानाची जाणीव. त्या काळात किल्लेदार ते गाव-पाटीलही होवु शकणारे महार मोगली झंजावातातही कसे टिकाव धरतात आणि संताजी-धनाजीच्या क्रांतीत कसे भाग घेतात, रणमर्दानी ताराराणीच्या मागे समाजही कसा ठाम उभा राहतो आणि बाळाजी विष्वनाथामुळे ताराराणीचा विश्वासघात होवुन “तोतया” मानला गेलेला शाहु राजा होवुन भाउबंदकी सुरु झाल्यावर सारा गावच कसा व्यथीत होतो…आणि सारेच हळु हळू अमानवी संक्रमणाला कसे बळी पडत जात शेवटी “यथा राजा…तथा प्रजा” या न्यायाने अध:पतीत होत जातात याचे चित्रण मी यात केले आहे. सगळ्यात अधिक भोगावे लागले ते दलित समाजाला. त्याच्यावर एवढी धार्मिक/सामाजिक बंधने लादली गेली आणि त्यांना पराकोटीच्या गुलामीत ढकलले गेले. काहींनी धर्मही बदलला…समानता आणि न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. या कादंबरीत मी, माझ्या नायकाचा एक शुर पण जातीयतेने अगतीक झालेला भावु इस्लाम स्वीकारतो, मोठा सरदारही बनतो, पण त्यालाही आस्तित्वाच्या प्रष्नाने मरेपर्यंत भेडसावले आहे. उत्तरेत मराठ्यांबद्दल द्वेष कसा वाढत गेला आणि म्हणुनच पानिपत युद्धातुन पळणार्या मराठ्यांना तिकडील सामान्य प्रजेनेही सहानुभुती दिली नाही याचेही चित्रण मी यात केले आहे.
इतिहास हा वरिष्ठ वर्ग आपल्या सोयिनुसार कनिश्ठ वर्गावर लादत असतो. हा जगाचाच एक दुदैवी इतिहास आहे. आपल्या पुर्वजांना अलौकिकत्व देण्यासाठी इतिहास वाकवला जातो. त्याची प्रसंगी मोडतोडही केली जाते. पण ज्यांचा इतिहासच लिहिला गेला नाही त्या जनसामान्यान्चे काय़? त्या दलितांचे काय ज्यांनी एवढ्या पराकोटीच्या अमानुष अन्याय सहन करित राहुनही माणुसकीच जपली, त्यांचे इतिहासातले स्थान कोणाही रणधुरंधरापेक्षा श्रेश्ठ नाही काय? उच्च वर्णीयांनी इंग्रजाविरुद्ध तर कधी इस्लामीयांविरुद्ध तर कधी स्वकीयांविरुद्ध सशस्त्र बंडाच्या घोषणा केल्या…क्रुतीतही उतरवल्या…पण दलित समाजाने कधीही या स्वार्थ्पुरित, पराकोटीच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलण्याचा विचार केला नाही. शेवटी त्यांनी अत्यंत नविलाजाने या अन्यायि धर्माला लाथ मारली…पण स्वीकारला तो करुणामयी…मानवतेचा…अहिंसेचा धर्म, बुद्ध धर्म…! बाबासाहेबांनी ही जी क्रांती करुन दाखवली त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. खरे तर या आजही दहशतवादी बनलेल्या…नकळत या “हिंदु” (खरे तर वैदिक) दहशतवादात जे सामील करुन घेतले जातात, नपुंसक हिन्सेचे तांडव घालतात, हिंसेचे समर्थन करतात, त्या मनो-विक्रुतांना हा मानवतावाद काय असतो हे समजावुन सांगण्याची गरज आहे…त्यांचा त्याग करण्याची गरज आहे. मी मानवतेचा विशाल पट या कादंबरीतुन निर्माण करुन मानव्याची महनीयता काय असते हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातुन केला आहे. मराठी माणसात कोठे तरी थोडा तरी विवेक आजही कायम असेल ही, वेडी असली तरी, आशा आहेच. एका दलितेतर माणसाने ही कादंबरी लिहिली आहे…काही न्युन राहीले असेल तर क्षमाप्रार्थी आहे…
-संजय सोनवणी
साभार http://sanjaysonawani.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.