मंत्रालयात बदल्यांचा बंपर धमाका

कोरोनाच्या नावाखाली आणखी ७६ अधिका-यांच्या बदल्या

मुंबई, दि. ८ जुलै, २०२०: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाचे गांभीर्य आणि निकड या गोंडस नावाखाली राज्याच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यांचा बंपर धमाका सुरू केला आहे. राज्यातील विविध नगर परिषद/ नगरपालिका आणि मनपात कार्यरत असलेल्या वर्ग अ व ब च्या तब्बल ७६ पेक्षा अधिक मुख्याधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्यात शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक नगरपालिका, नगर परिषद आणि मनपा या विविध उपाययोजना करत आहे. शिवाय राज्य सरकारने नियमित बदल्या न करण्याचे धोरण स्वीकारले असले तरी कोरोनाच्या नियंत्रणाचे कारण देत नगरविकास विभागाने बंपर धमाका सुरू ठेवला आहे.

या संदर्भात संबंधित अधिका-यांशी संवाद साधला असता, काही रिक्त जागा भरल्या गेल्या असल्याची माहिती दिली. मग जर काही मुख्याधिकारी स्तरावरील जागा रिक्त होत्या तर त्या कधीपासून होत्या? आणि कोरोनाच्या आधीपासून काही जागा रिक्त असतील तर मग त्या तत्काळ का भरल्या गेल्या नाही? कोरोनाचा प्रादुभार्वाला सुरुवात होऊन चार महिने उलटून गेले असता आणि आता कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत असतांना या घाऊक बदल्या करण्यामागची नेमकी कोणती ‘निकड’? त्याच बरोबर एका नगर परिषदेतून दुस-या नगर परिषदेत बदली करण्यात आल्याने यात नेमके कोणते ‘गांभीर्य’ नगरविकास विभागाने अधोरेखित केले? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवाय कोरोना वाढीच्या काळात गेल्या ४ महिन्यांपासून काम करणा-या मुख्याधिका-यांच्या अचानक बदल्या केल्याने कोरोनाविरोधी सुरू असलेल्या कामावरही परिणाम होणार नाही का? असाही सवाल उपस्थित झाला आहे.

नगरविकास विभागाने मे आणि जून महिन्यातही बदल्यांचा बंपर धमाका सुरू ठेवला होता. आता जुलै महिन्यातही बदल्यांचा बंपर धमाका सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या बदल्यांमुळे त्या त्या शहरात किती प्रमाणात कोरोना आटोक्यात आला? यावर नगरविकास विभागाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा पुढे येऊ लागली आहे.
 
मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?
नगरविकास विभागाने या बदल्यांना कोरोना नियंत्रणासाठीचे ‘गांभीर्य’ आणि ‘निकड’ असे गोंडस नाव देत घाऊक बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे गृह विभागाच्या बदल्या करताना विश्वासात न घेतल्याने त्यास तत्काळ स्थगिती देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगरविकास विभागातील घाऊक बदल्यांबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.