वाघ्या…पुन्हा आणि पुन्हा वाघ्या!

“कुत्र्यासारखे एखाद्याच्या मागे लागणे” हा वाक्प्रचार सर्वपरिचितच आहे. पण एखाद्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या मागे हात धुवुन लागणे यासाठी काय नवा वाक्प्रचार बनवावा या गहन चिंतेत मी सापडलो आहे. या चिंतेचे निमित आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांनी कालच पुण्यात पत्रकार परिषदेत “रायगडावरील वाघ्याचा पुतळा ६ जुनपुर्वी हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुतळा उध्वस्त करतील.” असा इशारा त्यांनी दिला आहे.(संदर्भ. दै. सकाळ, दि.३० एप्रिल १२, प्रुष्ठ क्र.६, पुणे आव्रुत्ती) गेल्या वर्षीही याच सुमारास प्रवीणदादांनी हाच इशारा दिला होता.
त्यावेळीस मी दै. लोकमतमद्ध्ये लेख लिहुन वाघ्या कुत्र्याचा इतिहास आणि तुकोजीराजे होळकरांची शिवस्मारक व वाघ्याच्या समाधीसाठी केलेली रु. ५०००/- ची आर्थिक मदत याचे पुराव्यासहित विश्लेषन केले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणुन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांनी “वाघ्याच्या पुतळ्याला हात लावुन दाखवाच…!” असा प्रति-इशारा संभाजी ब्रिगेडला दिला होता. फलस्वरुप संभाजी ब्रिगेडला आपला “तोडफोड” प्रकल्प स्थगित करावा लागला होता.
या घटनेला तब्बल अकरा महिने उलटुन गेले आहेत. आता अचानक जाग आल्याप्रमाने “वाघ्या कुत्त्र्याला कसलाही ऐतिहासिक पुरावा नसुन हा पुतळा हटवण्यासाठी युवराज संभाजीराजे यांच्या नेत्रुत्वाखाली ब्रिगेडचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पत्रव्यवहार चालु आहे. सहा जुनपुर्वी हा पुतळा हटवावा ही आमची लोकशाही मार्गाने केलेली मागणी असुन शासनाने याबाबत टाळाटाळ केली तर आम्हालाच तो हटवावा लागेल” असे प्रवीणदादांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. खरे तर जर एवढे पुरावे होते तर गेल्या अकरा महिन्यात कोणते जनजागरण ब्रिगेडने केले हा प्रश्न उपस्थित होतो. समजा शासनदरबारी “लोकशाही” मार्गाने पुतळा हटाव मोहीम सुरु आहे तर मग सहा जुनची मर्यादा घालत, त्यापुर्वी हटवला नाही तर आम्ही उद्ध्वस्त करु, ही मागणी कोणत्या लोकशाहीत बसते? असा कोणता नवीन शोध लागला आहे कि ज्यामुळे वाघ्याचा पुतळा ज्या ठिकाणी आहे तेथे मुळात वाघ्याऐवजी सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची समाधी होती हे सिद्ध होते? कि आम्ही सांगु तोच इतिहास हा सनातनी फंडा य्यांच्याही मनात रुजला आहे…फोफावतो आहे?
शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या दंतकथांच्या रुपात त्याची स्म्रुती जीवंत ठेवली. त्याचे शिवस्मारकासोबत स्मारक व्हावे या अपेक्षेने तुकोजीराजे होळकरांनी शिवस्मारक व वाघ्याच्या स्मारकाला आर्थिक मदत केली. शिवस्मारकाचे काम पुर्ण झाल्यावर उरलेल्या पैशांतुन हे स्मारक उभे राहिले. हे सारे ब्रिगेडच्या विचारवंत व इतिहासकारांना माहित आहेच. पण असे असुनही ते वाघ्याच्या स्मारकामागे हात धुवुन लागले आहेत याचे कारण म्हनजे पराकोटीचा ब्राह्मणद्वेष. ब्राह्मणांनी शिवरायांचा अवमान करण्यासाठी म्हणुन शिवस्मारकासमोर कुत्र्याचा पुतळा बांधला असा त्यांचा अजब तर्क आहे. पण शिवस्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेणारेही ब्राह्मणच होते…सातारकर वा कोल्हापुरकर काही केल्या स्वत:हुन पुढे आलेले नव्हते, त्याचे काय करायचे? म्हनजे इमानदार शिवप्रेमींचा व ज्या धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे त्यांचा अवमान करण्यासाठी ही तोडफोड मोहीम आहे, असेच नाही कि काय? कि हा सवंग प्रसिद्धीचा हव्यास आहे? तोडफोड, जाळपोळ असला अजेंडा घेत जी ही विध्वंसक वाटचाल सुरु आहे त्यावर ब्रिगेडने आत्मचिंतन करायला हवे. बहुजनांचा एवढाच कळवळा आहे तर शेतकरी आत्महत्त्या, पीण्याच्या पाण्याचा प्रश्न, बहुजनांतील वाढती बेरोजगारी असे सामाजिक प्रश्न हाती घेण्याऐवजी तरुणांना खोटी महिती देत त्यांना भडकावत त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या निमित्ताने उठतो.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली आहे कि “स्वतंत्र महामंडळाच्या ताब्यात स्मारके व किल्ले द्यावेत. शिवछत्रपतींवरील नाटक, चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी त्यांचे परिक्षण करण्याचा अधिकारही या महामंडळाला देणे आवश्यक आहे.” डा. आनंद यादव यांच्या संतसुर्य तुकाराम या कादंबरीवर वाद झाल्यानंतर ब-याच ह.भ.पं. नी “संतांवर लेखन करण्यापुर्वी वारकरी संप्रदायाची परवानगी घेतली पाहिजे व त्यांना दाखवल्याखेरीज प्रसिद्ध करता कामा नये.” अशा अर्थाचा फतवा निघाला होता. मला वाटते ब्रिगेड हीच चुक करत आहे. शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवत त्यांचे पुरेपुर अपहरण करण्याचा हा कट आहे. त्यासाठी जो मार्ग वापरला जात आहे तो सांस्क्रुतिक दहशतवादाचाच एक भाग आहे. तमाम महाराष्ट्रीयांनी या प्रव्रुत्तीपासुन सावध राहण्याची गरज आहे…

संजय सोनवणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.